

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित १३.३ किमी लांबीच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे गुंतवणूक व औद्योगिक वाढीला चालना मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
हा प्रकल्प म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे असे नमूद करून फडणवीस म्हणाले की, "याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा 'कनेक्टिंग लिंक' म्हटले पाहिजे. आता काहीही मिसिंग नाही, सर्व काही जागेवर आहे." हा प्रकल्प सात देशांतील तांत्रिक सहकार्याने पूर्ण करण्यात आला असून, या बोगद्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये करण्यात आली आहे.
सात हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प बोरघाटातील तीव्र चढाव आणि वळणांना वळसा घालून दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासोबतच रस्ते सुरक्षा सुधारेल अशी अपेक्षा आहे. राज्याची अर्थव्यवस्था ७० हजार कोटींची होण्यासाठी हा प्रकल्प कॅटॅलिस्ट ठरेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.
या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील अंतर ६ किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ २० ते ३० मिनिटांनी वाचणार आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा आणि देशातील सर्वात उंच 'केबल-स्टेड' पुलाचा यात समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या यशामध्ये सर्व स्तरावरील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. हा प्रकल्प म्हणजे केवळ एका व्यक्तीचे यश नसून, ज्या-ज्या हातांनी यात हातभार लावला त्या सर्वांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. एकेकाळी हा प्रकल्प रद्द करण्याचा किंवा न होण्याचा विचार सुरू होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान स्वीकारून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आणि कामाला सुरुवात केली, असे त्यांनी नमूद केले.