
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. भारताच्या ७५व्या स्वातंत्रदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्ग खुला होण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिर्डी ते नागपूरमधील ५२० किलोमीटर अंतराचा भाग पहिला सुरू करण्यात येणार असून याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र पूर्णपणे हा महामार्ग खुलण्यासाठी २०२३पर्यंत वाट पाहावी लागेल.
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि नागपूरमधील ७०१ किलोमीटरच्या मार्गावरील कार्य ८५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पूर्णपणे हा मार्ग खुला होण्यासाठी पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील माविआ सरकारने यावर्षी २ मे रोजी शेलू बाजार वाशीम ते नागपूर दरम्यान किमान २१० किमीचा पल्ला सुरू करण्याची योजना आखली होती; मात्र बुटीबोरीजवळील वायफळ येथील वन्यजीव ओव्हरपासच्या कमानाची रचना कोसळल्याने ही योजना अयशस्वी झाली, या दुर्घटनेत एका मजुराचाही मृत्यू झाला. जी इमारत कोसळली ती नागपूर जिल्ह्यातील शिवमडका-खडकी आमगाव येथील पॅकेज-१ अंतर्गत होती.
एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार आता समृद्धी महामार्गाचे तीन भाग करण्यात आले आहेत. भाग १मध्ये शिर्डी ते नागपूर दरम्यानचा ५२० किमीचा रस्ता खुला केला जाणार आहे. भाग २मध्ये, इगतपुरी आणि नागपूर दरम्यानचा ६२३ किमीचा महामार्ग वाहतुकीच्या कक्षेत आणणारा अतिरिक्त १०३ रस्ता खुला केला जाईल आणि भाग ३ मध्ये, संपूर्ण ७०१ किमीचा रस्ता २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विविध कंत्राटदारांचा समावेश असलेल्या १६ पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी वर्धा येथे पॅकेज २ आणि इगतपुरी येथे पॅकेज १४ हे दोन पॅकेज रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण झाले. पॅकेज २ मध्ये, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव ओव्हरपास बांधण्यात आला. त्यात दोन वन्यजीव ओव्हरपास आणि अंडरपास बांधण्याचा समावेश होता.