मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन तसेच बचाव पथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Published on

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि  मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

मुख्यमंत्री हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एन डी आर एफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली असून सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख आणि नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.राज्यात विशेषतः मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन तसेच बचाव पथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी. पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in