
पूनम पोळ / मुंबई
चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला १०० वर्षाहून अधिक काळ झाला. या एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचा निम्म्याहून अधिक म्हणजे ६० टक्के निधी हा शुद्ध लोककल्याणकारी योजनांवर खर्च करून मुंबईतील मंडळांना समाजसेवेचा पायंडा चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळाने घालून दिला आहे. यंदाच्या वर्षी मंडळाकडून रक्तदान शिबिरे भरवण्यात आली होती. आणि या उपक्रमाला ८६८ हून अधिक तरुणांनी प्रतिसाद दिला. तर दुसरीकडे निसर्ग वाचवण्यासाठी या मंडळाने खारीचा वाटा म्हणून ‘ सिडफॉल ‘ या योजनेतंर्गत हजारो वृक्षांचे वनीकरण केले.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हल्ली कोणत्याना कोणत्या कारणामुळे निसर्गावर हातोडा चालवण्याचा प्रकार सुरू आहे. परिणामी भविष्यात याचे दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यादरम्यान जवळच्या भागात म्हणजेच कर्जत, कसारा आणि नजीकच्या भागात जाऊन झाडांच्या बिया पेरून त्याची राखण करण्याचा संकल्प या मंडळाने केला आहे. तसेच, हे बियाणे प्रदीर्घ काळ टिकणार्या झाडांचे असून हा संकल्प दरवर्षी राबवण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदानंद लाड यांनी दिली.
ना नफा, ना तोटा या नियमानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. हा उपक्रम वर्षाच्या बारा महिने राबवला जात आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना माफक दरात उपचार घेता येत आहे. तसेच लालबाग परळ परिसरात लहान घरे असल्याने येथील विद्यार्थ्याना अभ्यास करताना अडचणी येऊ नयेत म्हणून मंडळाच्यावतीने वातानुकूलित ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, माफक दरात इंग्रजी सुसज्ज किलबिल नर्सरी चालवल्या जातात. तर, मंडळाच्या वतीने दरवर्षी मुंबईतील एका आदिवासी पाड्यावर जाऊन आरोग्य शिबीर घेतले जाते. तसेच गरीब गरजू लोकांना औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष लाड यांनी दिली.