कोरोनाची लाट संपली असली तरी वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप या आजारांनी तर वेळी यावेळी कोसळणाऱ्या पावसामुळे डेंग्यू - मलेरिया सारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक रुग्ण सध्या डेंग्यू- मलेरियाचा सामना करत असून अशातच मुंबईसह अन्य शहरात डोळे येण्याची साथ पसरली आहे.
पाणीदार डोळे, डोळे लाल होणे या लक्षणांनी नागरिक सध्या त्रस्त असून संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. डोळ्यांच्या संसर्गाने नागरिकांना ग्रासल्याचे निदर्शनास येत आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला वैद्यकीय विभागाकडून दिला जात आहे. दरम्यान, डोळ्यांबाबत विविध लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी घरगुती उपाय न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
संसर्ग कसा होतो ?
डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की, पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही, असं अनेकांना वाटतं म्हणून अनेकजण निष्काळजीपणा करतात. पण असं नाही, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
अशी घ्या काळजी?
डोळे आल्यास डोळ्यांना हात लावू नये
डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवत राहा
वेगळा रुमाल वापरावा
तेलकट खाणं टाळावे