डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाटीसाठी समिती स्थापन ;आठ दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाटीसाठी समिती स्थापन ;आठ दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : मुंबई कचरामुक्तीसाठी डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती स्थापना करा. तसेच समितीने आठवडाभरात कृती आराखडा सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, मुलुंड, कांजूरमार्ग आणि देवनार या डम्पिंग ग्राऊंडवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावत कचऱ्याचे ढीग हटवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय नगरविकास आणि नागरी सुविधामंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते. केंद्रीय नगरविकास आणि नागरी सुविधा विभागाचे सचिव मनोज जोशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास, शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने सद्यस्थितीत अस्तित्वास असलेल्या कचऱ्याचे जलदगतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. कांजूरमार्ग येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत उपलब्ध असणाऱ्या खारभूमीचादेखील पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता घेऊन सार्वजनिक कामाकरिता वापर करता येईल याबाबीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महानगरांमधील स्वच्छतेसोबतच क्षेपणभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मोहिमेला गती देऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in