
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे प्रवाशांची मोठी गर्दी जमली असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी गेल्या 12 तासांपासून जवळपास 300 पेक्षा जास्त प्रवासी अडकून पडले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण होऊ शकले नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिएतनामच्या Viet Jet कंपनीच्या विमानात हा बिघाड झाला आहे. हे विमान मुंबईहून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराकडे निघाले होते. यावेळी प्रवाशांनी आरोप केला आहे. उड्डाणाला उशीर होणार असतानाही एअरलाईनने कुठल्याही प्रकारची राहण्या-खाण्याची सोय केली नसल्याचा आरोप एका प्रवाशाने केला आहे. डीजीसीएच्या नियमानुसार, उड्डाणाला उशिर होणार असेल तर एअरलाईनने प्रवाशांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
यानंतर Viet Jet ने एक निवेदन जारी केले आहे. त्यात मुंबई ते हो ची मिन्हसाठी जाणारे विमान रात्री 1 वाजता उड्डाण करणार होते. मात्र, काही तांत्रिक बिघाड झाल्याने या विमाचे उड्डाण दुसऱ्या दिवशी रात्री 8:30 वाजता करण्यात येणार आहे. रिशेड्युलिंगमुळे इतरही काही विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला असून एअरलाईनच्या पॉलिसीनुसार, प्रवाशांना पुरवण्यात येणारे हॉटेल, जेवण, पेय तसेच इतर आवश्यक गोष्टींवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.