काँग्रेस नेते करणार अवकाळीग्रस्त भागाचा दौरा

या निर्णयानुसार, नाशिक जिल्ह्याची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली आहे.
काँग्रेस नेते करणार अवकाळीग्रस्त भागाचा दौरा
Published on

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या नेत्यांना शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार काँग्रेसचे ३४ नेते ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करतील आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली.

या निर्णयानुसार, नाशिक जिल्ह्याची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे नागपूर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मंत्री नसीम खान यांना ठाणे, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे लातूर, आमदार कुणाल पाटील अहमदनगर, माजी मंत्री सुनील केदार वर्धा, माजी मंत्री यशोमती ठाकूर अकोला, विधान परिषद गटनेते सतेज पाटील सातारा तर माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम हे सोलापूर जिल्ह्याची पाहणी करतील.

तर वसंत पुरके चंद्रपूर, पद्माकर वळवी धुळे, डॉ. सुनील देशमुख बुलढाणा, आमदार सुभाष धोटे गडचिरोली, संग्राम थोपटे सांगली, प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर परभणी, अभिजीत वंजारी गोंदिया, रणजित कांबळे अमरावती, राजेश राठोड धाराशीव, ऋतुराज पाटील रत्नागिरी, अमित झनक यवतमाळ, धीरज देशमुख बीड, रवींद्र धंगेकर कोल्हापूर, प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील नंदूरबार, हुसेन दलवाई पालघर, सुरेश टावरे रायगड, नाना गावंडे भंडारा, संजय राठोड जळगाव, हुस्नबानो खलिफे सिंधुदुर्ग, विरेंद्र जगताप वाशीम, माजी आमदार विजय खडसे हिंगोली तर नामदेवराव पवार हे जालना जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in