

मुंबई : महाविकास आघाडी सोबत मनसेची युती झाल्यास काँग्रेस मविआतून बाहेर पडणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली असताना जिल्हास्तरावर युतीचा प्रस्तावच नाही, त्यात गुरुवारी राज्य निवडणूक मंडळाची अखेरची बैठक संपन्न झाली. त्यामुळे मनसे सोबत युती नाहीच, असे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला वेळ असूनही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर ठरवू, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवस चाललेल्या या बैठकीत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय समीकरणं वेगळी आहेत. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, रासप यांच्याशी आघाडी झालेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत. पण सत्तेसाठी हे सर्वजण एकत्र आहेत. सत्तेसाठी काहीही व वाट्टेल ते अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत. त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे सपकाळ म्हणाले.
दादर येथील टिळक भवनात काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची दोन दिवसांची बैठक पार पडली. बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, सहप्रभारी बी. एम. संदीप, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस ऍड. गणेश पाटील, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सचिन नाईक आदी उपस्थित होते.
भाजप पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आमदार बंटी भागडिया यांचे कट्टर समर्थक आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. महायुतीमध्ये फसवणूक झाल्याची भावना तीनही पक्षांतील असंख्य पदाधिकाऱ्यांच्या मनात वाढीस लागलेली आहे. आगामी काळात सत्ताधारी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.
भुसारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचे बुधवारी अपघातात दुःखद निधन झाले. गुरुवारच्या राज्य निवड मंडळ बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी मौन राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.