मिठी नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. यात मिठी नदीचे रुंदीकरण करण्यात येणार आहे; मात्र मिठी नदीच्या रुंदीकरणात माहीम येथील १९ घरांचे काही बांधकाम जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यामुळे घराचा एरिया कमी होणार असून, पालिका अन्य पर्यायी जागा उपलब्ध करून देत नाही, असा दावा येथील रहिवाशांनी केला आहे.
२६ जुलै, २००५मध्ये मिठी नदीचे अस्तित्व समोर आले आहे. आता नदीचे रुंदीकरण करण्यात येणार असून, माहीम कॉजवे कोळीवाडा, जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरून होणार आहे; मात्र या रुंदीकरणात कोळीवाड्यातील १९ बांधकामे असून, त्या घरांचे काही बांधकाम पाडण्यात येणार आहे. बाधित होणारे बांधकाम सात दिवसांच्या आत स्वतः पाडा; अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता पाडण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने दिला आहे. तसेच या कारवाईत कुठलीही हानी झाल्यास त्यास पालिका जबाबदार नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.