
मुंबई : तमिळ अभिनेता धनुष याच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह विधान करणारा बॉलीवूड अभिनेता कमाल खानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०१७ मध्ये वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती करीत कमालने याचिका दाखल केली आहे. याचिकेवर याच आठवड्यात द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.
तमिळ अभिनेता धनुष व सहकलाकारांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी कमाल खानवर वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. माझा कोणताही दोष नसून एफआयआरमधील आरोपात कुठलेही तथ्य नाही, असा दावा कमाल खानने याचिकेत केला आहे. त्याच्या वतीने ॲड. सना रईस खान यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर निकाल येईपर्यंत आपल्याविरोधात सुरू केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कमाल खानने याचिकेतून केली आहे. सध्या दुबईत राहणारा कमाल खान हा मुंबईचा कायमस्वरूपी रहिवासी आहे. त्याला तीन वर्षे एफआयआरची माहितीच मिळाली नव्हती. २०२० मध्ये एफआयआरबद्दल माहिती देण्यात आली, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.