
मुंबई : राज्य प्रशासनातील पदे कंत्राटी तत्वावर भरण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर विरोधी पक्ष आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जोरदार टीका होत असताना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार आणि नायब तहसीलदार ही पदे सहा महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत जाहिरात दिली आहे. या जाहिरातीवरून नवा वाद निर्माण झाला असून ती रद्द करण्याची मागणी होत आहे.
शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्थ केल्यानंतर आता अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार आणि नायब तहसीलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तत्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी, अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.