
सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी शिधा योजनेच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी केला. मंत्रिमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पॅकेजसाठी एक रुपयाही न घेता हे पॅकेज मोफत द्यावे आणि थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी दानवे यांनी केली.
४ ऑक्टोबरच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोरगरीब जनतेला रेशन दुकानांच्या माध्यमातून दिवाळी फूड किट देण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या योजनेसाठी एनसीडीइएक्स ई मार्केट लिमिटेडच्या वतीने दि. १ ऑक्टोबरला परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले.