दहिसर-मीरा रोड ते भाईंदर प्रवास आता सुसाट होणार आहे. दहिसर-मीरा रोडपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे दहिसर ते मीरा रोडदरम्यानचा प्रवास अवघ्या १० ते १२ मिनिटांत होणार असून, या पुलासाठी मुंबई महापालिका तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्चणार आहे. दोन हजार कोटींपैकी ४०० कोटी रुपये जमीन संपादनासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
मुंबईत प्रवेश करताना बाहेर येणाऱ्या वाहनांना भाईंदर ते दहिसर दरम्यान वाहतूककोंडीचा मोठा फटका बसतो. त्यामुळे अगदी १० ते १२ मिनिटांच्या प्रवासाला नागरिकांना अर्धा ते पाऊण तास आणि वाहतूककोंडी झाली, तर त्याहूनही जास्त वेळ लागत असल्याने या वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून दहिसर ते मीरा रोड, भाईंदरपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने हा पूल चार लेनचा बांधण्यात येणार आहे. दहिसर कांदळपाडा ते मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत पूल बांधण्यात येणार आहे.