कायदेशीर दत्तक प्रक्रिया न करता नवजात बाळाचा व्यवहार

डॉक्टरांनी त्यांना बाळाला तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला
कायदेशीर दत्तक प्रक्रिया न करता नवजात बाळाचा व्यवहार

मुंबई- कायदेशीर दत्तक प्रक्रिया न करता एका सात दिवसांच्या नवजात बाळाचा व्यवहार करुन उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ-कल्याण प्रवासादरम्यान बाळाचा इन्फेशन होण्यास तसेच त्याच्या जिवाला धोका होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

इर्शाद इश्तियाक रंगरेज, ताहिरा इर्शाद रंगरेज आणि रुबीना बानो अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. २४ जुलैला परळच्या वाडिया रुग्णालयात एक सात दिवसांचे बाळ ऍडमिट झाले असून या बाळाला काविळ झाल्याचे झाल्याचा एक संदेश भोईवाडा पोलिसांना प्राप्त झाला होता. यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक आश्‍विनी गायकवाड व त्यांचे पथक तिथे रवाना झाले होते. चौकशीदरम्यान या बाळाला इर्शाद आणि ताहिरा या पती-पत्नीने ऍडमिट केले होते. ते दोघेही उत्तरप्रदेशच्या प्रतापगढचे रहिवाशी असून सध्या ते भिवंडीत राहतात. त्यांनी एका महिलेकडून ते बाळ दत्तक घेतले होते. दत्तक घेतलेल्या बाळाचे दहा रुपयांच्या स्टॅम्प पेपर शपथपत्र बनवले. ते दोघेही सांगत असलेली माहिती विसंगत होती. बाळाचा आईला पोलीस ठाण्यात हजर करण्यास सांगूनही त्यांनी तिला हजर केले नव्हते. त्यामुळे या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत इर्शाद आणि ताहिरा हे पती-पत्नी असून त्यांचे २९ डिसेंबर २०१६ रोजी विवाह झाला होता. मात्र लग्नाला सहा वर्ष उलटूनही त्यांना मूल झाले नाही. त्यामुळे ताहिरावर भिवंडीतील एका डॉक्टरकडून उपचार सुरु होते. भिवंडी येथे राहत असताना त्यांची रुबीना बानो या महिलेशी ओळख झाली होती. जुलै २०२३ रोजी रुबीनाने त्यांना फोन करुन तिच्या नातेवाईकाला एक मुलगा झाला असून ते बाळ त्यांना दत्तक देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे ते दोघेही बाळ दत्तक घेण्यासाठी उत्तरप्रदेशात गेले होते. या बाळाविषयी कोणालाही काहीही सांगू नका, कोणी विचारल्यास ते बाळ तुमचेच आहे असे सांगा असे रुबीनाने त्यांना सांगितले. मात्र त्यांनी दहा रुपयांच्या स्टॅम्प पेपर एक शपथपत्र लिहून घेतले आणि ते बाळ घेऊन मुंबईत आले होते. चौदा तासांच्या प्रवासामुळे या बाळाला इन्फेशन झाले होते. त्यामुळे ते दोघेही त्याला घेऊन भिवंडीतील रुग्णालयात गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना बाळाला तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. या बाळाला काविळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही माहिती नंतर माटुंगा येथील बाल कल्याण समितीला कळविण्यात आली होती. त्यांच्याच तक्रारीनंतर इर्शाद, ताहिरा आणि रुबीनाबानो या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत ताहिरा आणि इर्शादला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

logo
marathi.freepressjournal.in