राज्यातील शिवसैनिक बंडखोरांच्या विरोधात सतत आंदोलन करत आहेत. त्यामुळे या बंडखोरांनी केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने बंडखोर १६ आमदारांच्या घराबाहेर ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. त्यानुसार सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. २५ जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या गटाने केंद्रीय गृह सचिव व राज्यपालांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. त्यामुळे रविवारी सर्व बंडखोरांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा तैनात केली आहे. या सर्वांना ‘वाय प्लस’ सुरक्षा दिली आहे. केंद्र सरकारपूर्वी एकनाथ शिंदे गटाने महाराष्ट्र सरकारकडे आपल्या कुटुंबाची सुरक्षा मागितली होती.
तर राज्य सरकारने सांगितले की, या आमदारांच्या सुरक्षेत कोणतीही कपात केली नाही. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बंडखोर आमदारांच्या परिवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेशी दगाबाजी केल्यामुळे राज्यातील शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करत आहेत. या सर्व घडामोडींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनावर मात करून पुन्हा राजभवनात परतताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यपालांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.