
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी खात्रीशीर बातमी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व आले आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या विस्तारावर ते अंतिम शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवादही सुरू आहे.आता पुढची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याचीही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी दिल्लीला रवाना झाले. दिल्ली भेटीत फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तार तसेच न्यायालयातील प्रकरण यावर त्यांची पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशीही चर्चा आहे.