नागपूर : मुंबईत महायुतीतच लढणार, महायुतीचाच झेंडा फडकणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेत विकासमुख आणि पारदर्शक शासन आणणार, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला वाटते की, कोणामध्ये फार काही नाराजी असेल असे मला वाटत नाही कार्यकर्त्यांना वाटते की, जास्त संधी मिळाली पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचे आहे की, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं. मुंबई महापालिकेत विकासमुख आणि पारदर्शक शासन आणणं. त्यासाठी महायुतीचा निर्णय केला आहे.
नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका नाही!
नबाव मलिक यांच्यावर मनी लॉड्रींग सारखे गंभीर आरोप असून महायुती नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार नाही, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी नुकतीच जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांनीही साटम यांच्या भूमिकेला दुजोरा देत भाजपने याआधीच मलिक यांच्या विषयी भूमिका स्पष्ट केली आहे, असे म्हणाले.
कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही!
कल्याण डोबिवली महानगरपालिकेबद्दलही देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप ५५ जागांची मागणी का करेल? भाजपा हा एक महत्वाचा पक्ष आहे. अशी अजून कुठलीही मागणी केली नाही. कल्याण डोबिवलीत मागच्यावेळी आमच्या ४२ जागा आल्या होत्या. त्यामुळे आम्ही तिथे प्रमुख पक्ष आहोत आणि तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत. एक शिवसेना आणि दुसरा भाजप. बाकी तिसऱ्या पक्षाचे तिथे फार काही अस्तित्व नाही. आम्ही आपआपसात बसून तिथे जागा वाटप करू, असेही ते म्हणाले.