BMC Election : मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

तुम्ही म्हणजे मराठी नव्हे, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. महाराष्ट्राकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना ललकारले. ते म्हणाले, “काही लोकांनी काल माझी नक्कल केली...
BMC Election : मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
Photo : X (devendra fadanvis)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही मुंबई कोणाचा बाप आला तरी महाराष्ट्रापासून तूटू शकत नाही. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नव्हे, तर तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे मराठी नव्हे, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. महाराष्ट्राकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना ललकारले.

“काही लोकांनी काल माझी नक्कल केली. पण त्यांना समजायला पाहिजे की, नक्कल करता-करता काकांची काय परिस्थिती झाली. पण काकांना किमान नक्कल तरी करता येते. पण तुमची काय अवस्था होईल? मला आव्हान देतात की, आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे तुम्हाला मुलाला प्रमोट करायचे आहे. अरे बाबा जर आदित्यशीच चर्चा करायची असेल तर आमची उमेदवार शीतल गंभीर पुरेशी आहे. उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरे येऊ देत, आमच्या शीतल गंभीर येतील. मग करूया चर्चा, असे आव्हानही फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना दिले.

“काहीही झाले तरी मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. तसेच कोणाचाही बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करता येणार नाही. ठाकरे बंधू हे हिंदी सक्तीसाठी नव्हे तर सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले की, “आधी म्हणायचे की हिंदी सक्तीविरोधात आम्ही एकत्र आलो अन् आता काय तर आम्ही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र आलो. या राज्यात हिंदी सक्ती करणारे कोण? २१ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्रावर माशेलकर समिती तयार झाली. या समितीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०२१ मध्ये अहवाल सादर केला. हा अहवाल सादर झाल्यानंतर २० जानेवारी २०२२ ला उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाकडे आला. पहिली ते बारावीपर्यंत हिंदीला उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने मान्यता दिली. त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा कॅबिनेट झाली. त्यावेळी इतिवृत्त समोर आले, त्यालाही उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली. त्यावर त्यांची सही असल्याचा कागद माझ्याकडे आहे.”

मुंबई महानगरांत तिसरे एअरपोर्ट उभारणार

मुंबईच्या विमानतळावर एकच धावपट्टी होती, जागा कमी पडत होती. म्हणूनच नवी मुंबईत नवीन विमानतळ तयार केले. पण ‘तुझको मिर्ची लगी तो, मैं क्या करू.’ अरे पण आत्ताच सांगतो की, आता तिसरे विमानतळही करणार आहे. जर लंडनला तीन विमानतळ असू शकतात, तर मुंबईत का नाही, अशा शब्दांतही फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

ठाकरे बंधूंचे मुंबईवरील प्रेम हे पुतनामावशीचे - शिंदे

मुंबईचा महापौर हा मराठीच राहील व मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकणार नाही. ठाकरे बंधूंचे मुंबईवरील प्रेम हे पुतनामावशीचे प्रेम असून, त्यांना मुंबईची सत्ता हवी आहे, पण मुंबईकर तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. तुम्ही करून नाही, खाऊन दाखवले, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in