राजकीय दुकानं वाचवण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र देवेंद्र फडणवीस यांचा टोला

हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले आहेत
राजकीय दुकानं वाचवण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबई : केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, अशा प्रकारचा अजेंडा कुणी कितीही आणला तरीही लोकांच्या मनात जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत ३६ काय १०० पक्ष एकत्र आले तरीही लोकांच्या मनातून ते मोदींना काढू शकत नाहीत. आपली राजकीय दुकाने वाचवण्यासाठी हे लोक एकत्र आले आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

फडणवीस म्हणाले, ‘‘मोदीजी त्यांच्या कार्यामुळे, नेतृत्वामुळे आणि देशाला प्रगतिपथावर नेल्यामुळे लोकांच्या मनात आहेत. गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला, त्यामुळेच मोदीजी सामान्यांच्या मनात आहेत. स्वत:चा विचार न करता देशाला सर्वस्व देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. मुंबईत जे पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत, ते काही देशाचा विचार करून नाही तर आपली राजकारणातली दुकानं वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत.’’

फडणवीस म्हणाले, ‘‘आजच पाच पक्षांनी पंतप्रधानपदावर दावा ठोकला आहे. इंडियाचे पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत. यांनी ठरवला तरीही तो जनतेला पटला पाहिजे. यांचा कुठलाही उमेदवार जनतेलाही पटत नाही. बॅनरबाजी करून, एकत्र येऊन आणि घोषणाबाजी करून आपला टाइमपास ते करत आहेत. मात्र, त्याचा काही परिणाम होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in