मुंबई : गुरुपौर्णिमेला आध्यात्मिकदृष्टया आपल्या भारतीय संस्कृतीत मोठे स्थान आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जण आपापल्या गुरुंना यानिमित्त त्यांची भेट घेऊन त्यांना अभिवादन करत असतो. मुंबईत गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक मंदिरांमध्ये दर्शनाला मोठी गर्दी जमली होती. गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
अनेक ठिकाणी गुरुपूजा, मंगल आरती, प्रवचन, धार्मिक गाणी गायली गेली. संपूर्ण देशात गुरुपौर्णिमा हा सण हिंदू, जैन व बुद्ध धर्मात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक आपल्या धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा गुरुंना अभिवादन करतात.
‘गुरु-शिष्य’ परंपरेनुसार हा दिवस साजरा केला जातो. आपले ज्ञान पिढयान पिढया पोहचवण्यात या ‘गुरु-शिष्य’ परंपरेचा मोठा हातभार लागला आहे.
चेंबूरच्या श्री स्वामी समर्थ मठाचे विजय नलावडे म्हणाले की, आम्ही मठात अभिषेक व आरती केली. तर रात्री महाआरती केली. आपल्या गुरुला अभिवादन करण्याचा भाग म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
या दिवसाला ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात. आमचे अनेक गुरुबंधू मठात येऊन नामस्मरण करतात. तसेच उपवासही ठेवतात. सर्वच गुरु आपल्या भक्तांना समानता, चांगले वागण्याचा संदेश देतात.
‘इस्कॉन’ मंदिरात भगवान कृष्णाची मंगल आरती केली जाते. त्यानंतर तेथे ‘इस्कॉन’चे संस्थापक श्री प्रभूपाद यांची गुरुपूजा व गुरु आरती केली जाते. ही पूजा काही खास शिष्यांमार्फत होते. तेथे सर्वांना प्रवेश नसतो. श्री प्रभूपाद यांच्या भागवतम् यांची ध्वनीमुद्रित केलेल्या व्याख्याने लावली होती.
गुजरातच्या धर्मापूर येथील श्रीमद् राजचंद्र मिशनतर्फे तीन दिवसांचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव जैन धर्मियांच्या वतीने साजरा केला जातो
१९ व्या शतकात श्रीमद् राजचंद्र हे जैन धर्मियातील सुधारणावादी संत होते. तसेच ते कवी व तत्वज्ञ होते.
मुंबादेवी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त नवचंडी यज्ञाचे आयोजन केले होते