

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) पहिल्या टप्प्यात जवळपास १० हजार घरे वितरित केली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या नागरी नूतनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही अत्यंत महत्त्वाची पायरी ठरेल, असे ते म्हणाले.
विधानसभेत भाषण करताना मुख्यमंत्री म्हणाले की प्रकल्पाअंतर्गत धारावीतील पात्र रहिवाशांचे मूळ जागेवर मोफत पुनर्वसन केले जाईल. हे करताना पायाभूत सुविधा सुधारण्यात येतील. तसेच मुंबईत इतरत्रही नियोजित पुनर्विकासाची रूपरेषा यातून निश्चित होईल. सिंगापूर, हाँगकाँगसारख्या जागतिक शहरांपासून धारावीच्या परिवर्तनाची प्रेरणा घेतली जाईल. पण त्याबरोबरच धारावीतील निवास-रोजगार परंपरेचे आणि चैतन्यमयी आर्थिक परिसंस्थेचे जतनही केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले, की पात्र रहिवाशांना
धारावीतच नवीन घरे मिळतील. त्यामुळे कुटुंबांना त्यांच्या रोजगारस्थळाजवळ, उद्योगांजवळ आणि समुदायात राहता येईल. ज्यांना धारावीत राहता येणार नाही, अशांच्या पुनर्वसनासाठी मुंबई महानगर क्षेत्रात योग्य जागा निश्चित केल्या गेल्या आहेत.
प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या टप्प्याला पोहोचल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सेक्टर ६ मध्ये रेल्वेच्या जमिनीवर रहिवाशांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, कराराची पूर्तता करण्याबाबत आणि स्थलांतराबाबत कळवण्यात आले आहे. या ठिकाणी पावसाळ्यानंतर बांधकामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
तेथील कुटुंबांना त्यांची कायमस्वरूपी घरे बनेपर्यंत संक्रमण निवासात राहण्याचा किंवा मासिक घरभाड्याचा पर्याय देण्यात आला आहे. संक्रमणाच्या काळात या कुटुंबांना आधार देण्याचा हा प्रयत्न आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील १९ समूह पुनर्विकास योजनांसाठी आदर्श प्रारूप ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
धारावीचा पुनर्विकास हा केवळ घरांच्या पुनर्बाधणीचा प्रकल्प नाही; तो मुंबईच्या भविष्यातील नियोजित आणि समावेशक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
आधुनिक आणि सुरक्षित घरे, चांगल्या सुविधा, रोजगाराच्या संधी आणि महिलांसह प्रत्येक घटकासाठी प्रगतीची दारे उघडणे -या सर्वांचा समन्वय साधणारा हा पुनर्विकास असेल.
सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री