

मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर गाजत असलेल्या एका मोठ्या सायबर टोळीचा आणि डिजिटल अरेस्टच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एका फसवणूक प्रकरणाच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतून फहीम मोईन हुसैन सय्यद आणि नईम मुईन सय्यद या दोघांना अटक केली आहे. या रॅकेटद्वारे तब्बल २७ हजार ८५० कोटी रुपयांहून अधिक व्यवहारांची उलाढाल झाल्याचा संशय असून, देशभरात ३३० तक्रारी आणि १६३ गुन्हे दाखल झाले आहेत.
उत्तर गोव्यात २०२५ मध्ये एका महिलेची २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या गुन्ह्याच्या आधारे सुरू झालेल्या तपासात देशभरात पसरलेले हे नेटवर्क उघडकीस आले. सायबर गुन्ह्यातून आलेली रक्कम काही तासांतच बंद पडलेली आणि नव्याने उघडलेली बँक खाती, शेल कंपन्या आणि तब्बल ४०० हून अधिक वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली जात होती. त्यानंतर ही रक्कम रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या अधिकृत मनी चेंजर्स कंपन्यांमार्फत परकीय चलनात रूपांतरित केली जात होती.
मुंबई, गोव्यात २० ठिकाणी छापे
तपासात असाही धक्कादायक खुलासा झाला आहे की, चालक आणि चाळीत राहणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांच्या नावे कंपन्या स्थापन करून त्यांना संचालक दाखवले जात होते. मात्र, या खात्यांचे नियंत्रण मुख्य सूत्रधारांकडेच होते. याप्रकरणी ईडीने मुंबई आणि गोव्यात २० ठिकाणी छापे टाकून ३ कोटी २५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाची डिजिटल कागदपत्रे जप्त केली आहेत. मुंबई न्यायालयातून ट्रान्सिट रिमांड मिळवून दोघांनाही पुढील तपासासाठी गोव्यात नेण्यात आले आहे.