
मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या पालिका कर्मचाऱ्याची दहा वर्षांनी दिंडोशी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला.
सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी केवळ पीडित मुलीच्या जबाबावरून विनयभंगाचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत निर्दोष मुक्तता केली पालिका कर्मचाऱ्याने पॅथॉलॉजी रिसेप्शनिस्ट मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होता.
२०१४ मध्ये कांदिवली येथे पॅथॉलॉजीमध्ये दुपारी अल्पवयीन मुलगी एकटी असताना तेथे अनोळखी व्यक्ती आला आणि विनयभंग करून पळाला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पोलिसांनी सात महिन्यांनंतर आरोपी कमलेश वाघेला याला अटक केली होती. जवळपास दहा वर्षे गुन्ह्याचा खटला चालला.
घटना दिवसाढवळ्या घडूनही स्वतंत्र साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज वा इतर भक्कम पुरावे सादर केलेले नाहीत, असा युक्तिवाद करीत ॲड. प्रकाश साळशिंगीकर आणि ॲड. नितीन हजारे यांनी आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचा युक्तिवाद सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी ग्राह्य धरला आणि आरोपीच्या निर्दोष सुटकेचा आदेश दिला. केवळ पीडित मुलीच्या
जबाबावरून विनयभंगाचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले.