मुंबई तुंबली तर थेट कारवाई; पालिका आयुक्तांचा इशारा

रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून कामकाज केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या स्वच्छतेची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जलसाठवण टाक्यांची उभारणी केली.
मुंबई तुंबली तर थेट कारवाई; पालिका आयुक्तांचा इशारा

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात सखल भागात पाणी साचते, हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी ४८१ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहे. पंप कार्यरत आहेत की नाही, यावर जिओ टॅगिंगचा वॉच असणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पंप वेळेत सुरू न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिला आहे. तसेच पावसाळ्यात मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकलसेवा ठप्प होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्या, असे सक्त आदेश गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना लक्षात घेता, एनडीआरएफ, नौदलाची टीम शहर व दोन्ही उपनगरात तैनात असणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध कामे सुरू असून बुधवारी कामाचा आढावा घेतला. यंदाच्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती ओढवू नये, यासाठी बुधवारी पालिका मुख्यालयात संबंधित विविध प्राधिकरणाची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मध्य व पश्चिम रेल्‍वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तटरक्षक दल, नौसेना, एनडीआरएफ, मुंबई वाहतूक पोलीस, महाराष्‍ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्‍हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्‍ल्‍यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्‍मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्‍ट), टाटा पॉवर, अदानी एनर्जी आदींच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून कामकाज केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या स्वच्छतेची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जलसाठवण टाक्यांची उभारणी केली. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने सर्व कामे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, रेल्‍वेमध्‍ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्ज ठेवावी. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.

एनडीआरएफ, नौदल, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना

मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफची ३ पथके सज्ज असणार आहेत. तर पूर्व उपनगरासाठी अतिरिक्त पथक तैनात ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिल्या. भारतीय नौदलालाही त्यांची पथके आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अग्निशमन दलानेही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.

डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस द्या!

मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत. याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, डोंगरमाथा, डोंगरउतारावर राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजावाव्‍यात व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात. त्‍यांना आपत्ती समयीचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

पंप वेळेत कार्यरत नसेल तर कारवाई

जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदादेखील शहर आणि उपनगरात मिळून ४८१ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्‍यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्यप्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले.

म्हणून सहाय्यक आयुक्तांनी समन्वय साधावा!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील विविध कामे आणि मेट्रो रेल्वे इत्यादी प्रकल्पांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा पडून राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. प्रत्येक विभागातील सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठी त्या-त्या यंत्रणेशी समन्वय साधावा. तसेच, वाहतूक पूर्ववत होण्‍याकामी, स्थानिक कामे झाल्‍यावर बॅरिकेड्स काढावीत, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in