‘वंचित बहुजन’ इंडिया आघाडीत? आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

प्रकाश आंबेडकर यांनी अलिकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत जुळवून घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका करणेही बंद केले आहे.
‘वंचित बहुजन’ इंडिया आघाडीत? आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटासोबत युती आहे. मात्र, इंडिया आघाडीत त्यांना घेण्यावरून नेत्यांमध्ये मतभेद होते. तसेच, प्रकाश आंबेडकरांनीही राज्यातील इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांना आघाडीत सामिल करून घेण्याबाबत मतभेद होते. मात्र, आता त्यांना इंडिया आघाडीत घेण्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. तसेच वंचित आघाडीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही इंडिया आघाडीत सामिल होण्यासंबंधी पत्र लिहिले. आता यासंबंधी आगामी बैठकीत चर्चा होऊ शकते. त्यामुळे वंचित आघाडी इंडिया आघाडीत सामिल होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची या अगोदरच भेट झाली होती. या भेटीत आघाडीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यातच आता शरद पवार यांनीही वंचित आघाडीला इंडिया आघाडीत सामिल करण्याविषयी अनुकूलता दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यासंदर्भात इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीत यावर चर्चा होऊ शकते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सामिल झाल्यास राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरवर नुकतीच भेट घेतली होती. तेव्हापासून प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सामिल घेण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कारण त्यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात अनुकूल चर्चा झाली होती. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना आघाडीत सामिल करून घेण्यासंबंधी अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे आगामी बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

या अगोदर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत हे दोन पक्ष आपल्याला इंडिया आघाडीत सामिल करून घेत नसल्याचा आरोप केला होता. मात्र, अलिकडे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही इंडिया आघाडीत सामिल होण्यासंबंधी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी ज्या काही अटी असतील, त्यासंदर्भात बोलणी करण्याची तयारीही दर्शविली होती. त्यामुळे आगामी काळात यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जुळवून घेण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न

प्रकाश आंबेडकर यांनी अलिकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत जुळवून घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका करणेही बंद केले आहे. त्यातच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संविधान महासभेचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आगामी काळात प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीचा भाग बनू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in