मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा साथीच्या आजारांनी थैमान घातले असून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या आकडेवा रीनुसार, जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत शहरात मलेरियाचे ४,१५१ रुग्ण आढळले आहेत, तर मागील वर्षी याच काळात ही संख्या २,८५२ होती. डेंग्यूच्या बाबतीत तर ही वाढ अधिक धक्कादायक आहे. जुलै २०२५ मध्येच ७०८ डेंग्यूचे रुग्ण नोंदवले गेले, तर जूनमध्ये ही संख्या केवळ १०५ होती. चिकनगु-नियाच्या रुग्णांची संख्या जूनमधील २१ वरून जुलैमध्ये १२९ वर पोहोचली आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यावर्षी मे महिन्यातच लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे डासांच्या पैदाशीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याचे परिणाम आता डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दिसून येत आहेत. मलेरियाचा प्रसार 'ॲनोफिलीस' डासांमुळे होतो, तर डेंग्यू आणि चिकनगुनिया 'एडीस इजिप्ती' नावाच्या डासांमुळे पसरतात.
मुंबईतील अनियमित पावसामुळेही साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकाराऱ्यांनी सांगितले.
पालिकेकडून उपाययोजना सुरू
बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'शून्य डास उत्पत्ती मोहीम' या अंतर्गत डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. तसेच, नागरिकांना आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साचू न देणे, पाणी साठवलेली भांडी झाकून ठेवणे, कुलर आणि कुंड्यांमधील पाणी नियमित बदलणे आणि डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी किंवा जाळी वापरण्याचा सल्ला दिला आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.