
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे; मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही, हे माहीत असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित राहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा दंगल माजवू पाहत आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले की, “जिल्हा परिषद, अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत असून या सभेसाठी बोलवण्यात आलेल्यांचे रेटकार्ड प्रसिद्ध झाले आहे. यानुसार सभेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.”
शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टी पीडितांना तीन हजार कोटींची मदत योजना जाहीर केली आहे. अतिवृष्टी पीडितांना मदतीचे निकष १ हेक्टरने वाढवूनसुद्धा प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. सरकार एकप्रकारे आकड्यांचा खेळ करतेय. पिकांच्या प्रतवारीनुसार मदत करणे आवश्यक असताना सरकारने तुटपुंजी मदतीची फसवी घोषणा केल्याची टीका दानवे यांनी केली.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले, पूल वाहून गेले, त्याला कोणती मदत देण्यात आली नाही, त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा, अशी मागणी दानवे यांनी केली.