
मुंबई : सर्वाधिक सायबर हल्ले होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. सायबर संरक्षण हे भारतीय संरक्षण क्षेत्रासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याविरोधात लढा देण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) संशोधन सुरू आहे. त्यामुळे लवकरच डीआरडीओकडून सायबर हल्ल्यापासून संरक्षण मिळेल, असा विश्वास डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी व्यक्त केला.
आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टच्या सायबर हल्ले आणि डीआरडीओ कामगिरी या सत्रात डॉ. कामत यांचे भाषण झाले. यावेळी ते बोलत होते. सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून अनेकजण देशाचे संरक्षण भेदण्याचा प्रयत्न करत असतात. कधी हे दहशतवाद्यांकडून, तर कधी शत्रू राष्ट्रांकडून होते. या हल्ल्यातून बऱ्याचदा देशाची सुरक्षा धोक्यात येते. भारतामध्ये जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत ७.४० लाख सायबर गुन्हे तर ३७ लाख सायबर हल्ल्यांची नोंद झाली.
या हल्ल्यांमध्ये खासगी कंपन्या, बँका यांच्यासोबत सरकारी कार्यालये आणि काही लष्करी आस्थापनांवरील हल्ल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे सायबर हल्ले कसे रोखता येतील, या दृष्टीने आता डीआरडीओने संशोधन सुरू केले आहे.
भारतीय लष्कर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज व्हावेत यासाठी संशोधनावर भर देण्यात येत आहे. याकरिता तरुणांनी पुढे यावे यासाठी डीआरडीओने पाच नवीन संस्था सुरू केल्या आहेत. यात आर्टिफिशियन इंटेलिजन्स, असिमेट्रिक टेक्नॉलॉजी, स्मार्ट मटेरियल्स, क्वांटम टेक्नॉलॉजी आणि कॉग्निटिव्ह सेन्सर टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. या संस्थांची जबाबदारी ही ३५ वर्षांखालील तरुण शास्त्रज्ञांवर सोपविण्यात आली असल्याचे डॉ. कामत म्हणाले.