

मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जल्लोष दिवसेंदिवस वाढत असताना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना मात्र हळूहळू मागे पडू लागल्याचे दिसत आहे. शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन आणि प्लास्टिकमुक्त सजावट यांचा आग्रह काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर धरण्यात येत होता. मात्र आता पुन्हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग आणि थर्माकोल-प्लास्टिकच्या सजावटींचे प्रमाण वाढत असल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आता सूर मंदावल्याचे दिसत आहे.
गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक स्वरूप देण्यासाठी महापालिका, पर्यावरणवादी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांकडून दरवर्षी जनजागृती केली जाते. तरीही उत्सवातील वाढती स्पर्धा, भव्य मूर्ती आणि आकर्षक सजावटीच्या हव्यासापुढे पर्यावरणाचा मुद्दा दुय्यम ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या मूर्ती, भव्य सजावटींची स्पर्धा
विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या मूर्ती आणि भव्य सजावटीची स्पर्धा वाढली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर निर्माल्य, प्लास्टिक आणि इतर कचरा निर्माण होत असून विसर्जनानंतर समुद्रकिनारे आणि जलाशयांवरील प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनत आहे. तसेच घरगुती गणेशोत्सवातही पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर अपेक्षित प्रमाणात वाढताना दिसत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
शाडू मातीच्या मूर्ती तुलनेने महाग
‘पीओपी’च्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्ती महाग आहेत. त्याचप्रमाणे शाडू मातीच्या मूर्ती वजनाने अधिक असतात. तर ‘पीओपी’च्या मूर्ती हलक्या असतात. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणपती बसविणारे भाविक ‘पीओपी’च्या मूर्तींना पसंती देत आहेत. त्याचप्रमाणे शाडू मातीच्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार अधिक नाहीत, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.