मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्याविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कलमांतर्गत ‘ईडी’ने गुन्हा नोंदवला आहे. ५०० कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
खेळाच्या मैदानासाठी राखीव भूखंड वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलसाठी लाटल्याचा आरोप आहे. या भूखंडाची किंमत ५०० कोटी रुपये आहे. मुंबई मनपाचा तोटा करून राजकीय वजन वापरून त्यांनी हा भूखंड बळकावला. या प्रकरणी त्यांच्या पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा व आर्किटेक्ट अरुण दुबे हेही आरोपी आहेत. वायकर यांच्यासोबत अन्य आरोपींना लवकरच ‘ईडी’ चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिलेली सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित कागदपत्रे घेऊन बोलावण्यात येणार आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचे सर्व आरोप रवींद्र वायकर यांनी फेटाळून लावले होते.
‘ईडी’ने आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यावर आपला गुन्हा नोंदवला आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील ८ हजार चौरस मीटरचा भूखंड कमाल अमरोही यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. २००४ मध्ये बनावट करार करून वायकर व त्यांच्या कुटुंबीयांनी हा भूखंड खरेदी केला होता. हा भूखंड सार्वजनिक वापरासाठी व बगीच्यासाठी राखीव होता. २००४ मध्ये महाल पिक्चर प्रा. लि., रवींद्र वायकर व मुंबई मनपात या भूखंडावरून त्रिपक्षीय करार झाला. यातील ६७ टक्के भूखंड हा मनोरंजनासाठी विकसित करण्याचे ठरले, तर ३३ टक्के भाग हा खेळ व अन्य कामांसाठी वापरण्याचे ठरले.