
मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातील मतदान केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) त्रुटी होत्या, अशी स्पष्ट कबुली निवडणूक अधिकाऱ्याने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली. तसे प्रतिज्ञापत्रच न्यायालयात सादर केले.
न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवली. त्यावेळीही त्यांनी ते मान्य केले. मंगळवारी सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने बुधवारी ही सुनावणी निश्चित केली आहे. मतदान झाल्यानंतर जाहीर केलेले एकूण मतदान आणि मतमोजणीनंतर अर्ज २० अन्वये जाहीर केलेल्या उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी यात विसंगती असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कीर्तीकुमार शिवसरण यांनी अॅड. संदीप रणखांबे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर मंगळवारी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक अधिकाऱ्याने उत्तरे देताना लोकसभा निवडणुकीतील मतदानामध्ये तफावत असल्याचे मान्य केले. याची न्या. चव्हाण यांनी दखल घेत याचिकेची सुनावणी बुधवारी निश्चित केली आहे.