लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोगाकडून बगल; नाना पटोले यांचा हल्लाबोल

लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजप सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
 नाना पटोले
नाना पटोले
Published on

मुंबई : लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजप सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण या अधिकारावरच भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपला सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे. काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली. पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगाने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढलेले मतदार बांगलादेशातून आणले होते का?

विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढाला आहे. निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी, तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? लाडकी बहिण योजनेचा लाभ बांगलादेशींनी घेतल्याचे सरकार सांगत आहे. तसे विधानसभेला वाढलेले हे मतदार केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशातून आणले का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. लोकशाहीचे रक्षण व मतदारांची जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून राज्यभर आंदोलन करून पत्रकार परिषदा घेतल्या. नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते.

सरकारचा दुटप्पीपणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी, नोकर भरती करण्याचे आश्वासन देऊन भाजप युती सत्तेत आली आहे. पण आता हे सरकार कर्जमाफी देण्यासाठी, नोकर भरतीसाठी निधी नाही असे सांगत आहे. दुसरीकडे सरकार साखर कारखान्यांचे व्याज माफ करते हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. एसटी, रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ करून जनतेला महागाईच्या संकटात लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in