सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

शिक्षकदिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला
सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही दिल्याचे ते म्हणाले.

वर्षा येथील समिती सभागृहातून शिक्षकदिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सचिव रणजितसिंग देओल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते, तर राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करून देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले आहेत. राज्यातील सर्व मुलांना समान व गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत काही महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले आहेत,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर सहा टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचे नवीन शैक्षणिक धोरण आणताना या निर्णयांमध्ये विद्यार्थीकेंद्रित विचार असून संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्वस्तरांवरून काम करेल. यासाठी पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील काही उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद श्रीरामतांडा येथील शाळेमुळे १०० टक्के स्थलांतरण रोखल्याचे सांगतानाच पटसंख्येत वाढ झाली, असे सांगितले. कोणत्याही सुट्टीविना शाळा ३६५ दिवस अविरत सुरू राहणारी चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा, तोरणमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा आजूबाजूच्या २९ पाड्यांवरील १६०० मुलांसाठीची आदर्श निवासी शाळा झाली आहे, असे असंख्य नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. आदर्श शाळा निर्माण करण्याचे खरे शिल्पकार शिक्षक असून अशा शाळांची संख्या वाढविण्यासाठी निर्धार करू या आणि उर्वरित सरकारी शाळांचा विकास करून त्यात भरीव पटसंख्या वाढवूया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

शिक्षकांचे वेतन वेळेवर जमा होणार

शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विभागाला देतानाच, “केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील. त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in