१७ वर्षानंतरही मुंबईत ‘पूरस्थिती जैसे थे’ २६ जुलैच्या आठवणीने मुंबईकरांना आजही भरते धडकी

हिंदमाता परिसराला मात्र काहीसा दिलासा पूरमुक्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च
१७ वर्षानंतरही मुंबईत ‘पूरस्थिती जैसे थे’ २६ जुलैच्या आठवणीने मुंबईकरांना आजही भरते धडकी

मुंबई : २६ जुलै २००५चा तो दिवस... पावसाचे धूमशान आणि संपूर्ण मुंबईची ‘तुंबई’ झाली. तो दिवस आठवला तरी मुंबईकरांच्या काळजात धस्स होते. मायानगरी मुंबईत १७ वर्षांपूर्वी महापूर आला आणि त्यात शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला. मुंबईकरांच्या घरात पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २६ जुलैला आलेल्या महापुरानंतर मुंबई पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने ‘ब्रिमस्टोवॅट’साखरे प्रकल्प राबवले. पावसाचे पाणी साठवण करून ते समुद्रात सोडण्यासाठी हिंदमाता, किंग्ज सर्कल गांधी मार्केट, अंधेरी सबवे या ठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाक्या बसवल्या. मुंबई पूरमुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र आजही पावसाच्या हलक्या सरी बरसताच मुंबईतील अनेक भाग जलमय होतात. त्यामुळे मुंबईत काही वेळ जरी मुसळधार पाऊस बरसला तर आजही २६ जुलैच्या आठवणीने मुंबईकरांना धडकी भरते. आज बुधवारी २६ जुलै २०२३ रोजी मुंबईत आलेल्या महापुराला १७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे १७ वर्षांनंतरही मुंबईतील भयावह परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दरम्यान, हिंदमाता परिसर जलमुक्त करण्यासाठी पाणी साठवण करणाऱ्या भूमिगत टाक्या बसवल्याने या परिसराला काहीसा दिलासा मिळाला, हे नाकारता येणार नाही.

मुंबई पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने अनेक योजना राबवल्या किंवा राबवण्यात येत आहेत. परंतु आजही हलक्या पावसात हिंदमाता, दादर, माटुंगा, सायन, घाटकोपर अंधेरी, दहिसर आदी ठिकाणे पाण्याखाली जातात. अखेर हलक्या पावसापुढे मुंबई महापालिकेने हात टेकले असून रस्त्यावर जमा होणारे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंदमाता, गांधी मार्केट आदी परिसरात भूमिगत टाक्या बसवल्या. भूमिगत पाण्याच्या टाक्या बसवल्याने गेल्या वर्षी आणि यावर्षी सद्यस्थितीत तरी हिंदमाता परिसराला दिलासा मिळाला आहे.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत महापूर येण्यास पाऊस कारणीभूत ठरला, कारण त्यावेळी ९०० मिमीहून अधिक पाऊस पडला. तर प्लास्टिक पिशव्याही महापुरास कारणीभूत ठरल्याचे सांगत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री अथवा वस्तू देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री व खरेदी करणाऱ्यांवर कारवाईचे हत्यार उपसले. कारवाई करत हजारो रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या तर लाखो रुपयांचा दंड वसूल केला. मात्र प्रत्येक कामात राजकीय हस्तक्षेप आला तर कारवाई थंड होऊन जाते. त्यामुळे आजही गल्लीबोळातून ते चांगल्या दुकानातही या पिशव्या उपलब्ध होत आहेत. म्हणूनच मुंबईची तुंबई होण्यास पालिका प्रशासन व राजकीय पक्ष जबाबदार आहेत, असा आरोप मुंबईकरांकडून केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in