महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दिला निरोप; शेवटच्या दिवशी शिंदे, फडणवीसांनी घेतली भेट

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज शेवटचा दिवस, यानंतर ते डेहराडूनला जाणार असून नौदलाकडून मानवंदना
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दिला निरोप; शेवटच्या दिवशी शिंदे, फडणवीसांनी घेतली भेट
Published on

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी त्यांना निरोप देण्यात आला. आज संध्याकाळी ते डेहराडूनला रवाना होणार आहेत. आज त्यांच्या शेवटच्या दिवशी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला. तसेच, राजभवनावर नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्यासोबत, त्यांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.

गेले अनेक महिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत होते. त्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानांवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या आणि अखेर राष्ट्रपतींकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यानंतर रमेश बैस यांची राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सच‍िव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल तसेच प्राची जांभेकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.

logo
marathi.freepressjournal.in