Mumbai : एफडीएने ५ बेकऱ्यांचे परवाने केले रद्द; चार बेकऱ्या बंद

संपूर्ण शहरात राबवलेल्या एका विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे.
Mumbai : एफडीएने ५ बेकऱ्यांचे परवाने केले रद्द; चार बेकऱ्या बंद
Mumbai : एफडीएने ५ बेकऱ्यांचे परवाने केले रद्द; चार बेकऱ्या बंद
Published on

अमित श्रीवास्तव/मुंबई

संपूर्ण शहरात राबवलेल्या एका विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए), बृहन्मुंबई अंतर्गत येणाऱ्या माहिम येथील ५७ वर्षे जुन्या ‘ब्रिस्टल बेकरी’सह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच काळाचौकी येथील ‘बंगळुरू अय्यंगार बेकरी’सह इतर चार बेकऱ्यांना आपले काम तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत तसेच अन्न सुरक्षितता आणि मानके कायदा, २००६ च्या अंमलबजावणीला अधिक बळ मिळण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. एफडीएच्या पथकांनी मुंबईच्या सर्व विभागांमधील ३४ बेकरी आस्थापनांची अचानक पाहणी केली.

या तपासणीदरम्यान अस्वच्छता, अन्नपदार्थ हाताळण्याच्या असुरक्षित पद्धती, परवान्याच्या अटींचे उल्लंघन आणि इतर अन्न सुरक्षितता नियमांकडे दुर्लक्ष यांसारख्या अनेक त्रुटी समोर आल्या. काही आस्थापना तर आवश्यक नोंदणी किंवा परवान्याशिवाय चालू असल्याचे आढळून आले.

या संपूर्ण मोहिमेत एफडीएने २२ सुधारणा नोटीस , ४ स्टॉप बिझनेस नोटीस, ५ तत्काळ परवाना निलंबन आणि अन्न सुरक्षितता व मानके कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत ३ गुन्हे तडजोड प्रक्रिया सुरू केल्या आहेत.

या बेकऱ्यांचे परवाने रद्द

  • ब्रिस्टल बेकरी (माहिम)

  • अनमोल बेकरी अँड स्टोअर्स (अंधेरी पूर्व)

  • न्यू महाराष्ट्र बेकरी अँड स्टोअर (चेंबूर)

  • सबा बेकरी अँड स्टोअर्स (गोरेगाव पूर्व)

  • उन्नती बेकरी (दहिसर पश्चिम)

या बेकऱ्यांचे काम पूर्ण बंद

  • बंगळुरू अय्यंगार बेकरी (काळाचौकी)

  • गोल्डन बेकरी (घाटकोपर पश्चिम)

  • मिर्झा अँड सन्स बेकरी (विक्रोळी पश्चिम)

  • बिग बाइट बेकरी (कांदिवली पूर्व)

२००६ च्या तरतुदींचे पालन करावे

अन्न सुरक्षेचे निकष सुधारण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ही कठोर कारवाई सुरूच राहील, असे एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व बेकरी चालकांनी अन्न सुरक्षितता आणि मानके कायदा, २००६ च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. कोणी याचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in