

मुंबई : आवश्यक परवानग्या आणि नोंदणी नसल्याचे स्पष्ट झाल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने आयआयटी बॉम्बे येथील दोन वसतिगृहांच्या मेस चालकांना त्यांचे कामकाज तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पवई परिसरातील आयआयटीच्या वसतिगृह क्रमांक १ आणि २ मधील मेसची अचानक पाहणी करण्यात आली. या दरम्यान या भोजनगृहांच्या चालकांकडे अन्न सुरक्षेशी संबंधित आवश्यक परवाने नसल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांना कामकाज थांबवण्याचे थेट निर्देश दिले. वसतिगृह क्रमांक १२, १३ आणि १४ मधील मेसच्या पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळल्याने संबंधित कंत्राटदाराला आवश्यक सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून एफडीएने अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले.