एस. टी. महामंडळातील महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २०१८ मध्ये जाहीर केला होता. यानंतर महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिकाळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णयदेखील महामंडळाकडून यापूर्वी घेण्यात आला; मात्र प्रत्यक्षात मागील जवळपास दोन वर्षांपासून या बालसंगोपन रजेचा लाभ महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांना तसेच पत्नी हयात नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना झाला नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
परिणामी सण असो, अथवा यात्रा, किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना हजर राहत सेवा बजवावी लागत आहे. यामुळे ना रजा, ना रजांचा मोबदला, तर कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याने एसटी महामंडळातील महिला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांसोबत एसटी बसचे अनोखे नाते आहे. पंढरपूरची वारी असो, कोरोनासारखे भयाण संकट असो, गणेशोत्सव-होळी असो, अथवा राज्यातील कानाकोपऱ्यातील कोणत्याही गावची यात्रा असो. एसटी बस आणि कर्मचारी कायम प्रवाशांच्या सेवेत तत्पर राहिले आहेत; मात्र नोकरी करत असताना एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा मुलांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. मुलांच्या परीक्षांच्या काळात पालकांची गरज असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री रावते यांनी घेतला.
या रजेचा लाभ महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे. अशा पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले होते; परंतु प्रत्यक्षात या बालसंगोपन रजांचा लाभ भेटला नसल्याचे महिला एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
केवळ रजाच नाही, तर त्या रजांच्या मोबदल्यात केलेल्या कामाचे पैसेही एसटी महामंडळाकडून देण्यात आले नसल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.