दोन वर्षांनंतर मुंबईत गणेशोत्सवाची धूम पाहावयास मिळत असून गणेशोत्सव मंडळांत भक्तांची गर्दी होत आहे. कुठली दुर्घटना घडू नये, यासाठी गणेशोत्सव मंडळांत सजावट, पूजेचे साहित्य हे अग्निरोधक असावे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने गणेशोत्सव मंडळांना केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, यासाठी गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्ते व मुंबई पोलिसांना अग्निसुरक्षेचे धडे देण्यात येत असून लोकांचाही प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.
कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी सर्वत्र गणेशोत्सव थाटामाटात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती पाहण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या आहेत. अशा वेळी आग किंवा शॉर्ट सर्किटसारखी घटना घडली. तर प्राथमिक स्वरूपात नेमके काय करावे, यासंदर्भातील अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण मुंबई अग्निशमन दलातर्फे गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना दिले जात आहे. अग्निसुरक्षासंदर्भात दिले जाणारे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे कोणतेही गणेशोत्सव मंडळ स्वतःहून आपल्याजवळील अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण घेऊ शकतात. मुंबईत एकूण ३५ अग्निशमन केंद्र आहेत. अग्निशमन दलातर्फे मनपाच्या २४ वॉर्डात अग्निसुरक्षासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे.
घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विजेची रोषणाई करताना इलेक्िट्रक वायर आणि इलेक्टि्रक केबल याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पूजेसाठी वापरण्यात येणारी समई, दिवा आणि उदबत्ती योग्यप्रकारे लावावी. जळाऊ साहित्य योग्य अंतरावर ठेवावे आणि रात्रीच्या वेळेस त्याकडे विशेष लक्ष ठेवावे. मंडपात गणेशभक्तांनी अनावश्यक गर्दी टाळावी. बाहेर पडण्याचे मार्ग विनाअडथळे राहतील, याची काळजी घ्यावी.
- हेमंत परब, अग्निशमन दलाचे प्रमुख