जलयुक्त शिवार घोटाळाप्रकरणी चार जणांना अटक

जलयुक्त शिवार घोटाळाप्रकरणी चार जणांना अटक
Published on

बीडमधील बहुचर्चित अशा जलयुक्त शिवार योजना घोटाळ्याप्रकरणी बीडमधील परळी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये दोन विद्यमान कृषी सहाय्यकदेखील आहेत. तर इतर दोघेजण हे निवृत्त कृषी अधिकारी असल्याचे समजते.

परळी पोलिसांनी सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या पांडुरंग जंगमे, अमोल कराड यांना अटक केली आहे. तसेच दोन निवृत्त तालुका कृषी अधिकारी विजयकुमार भताने, शिवाजी हजारे यांना अटक केली आहे.

२०१८ मध्ये जलयुक्त शिवारच्या कामामध्ये घोटाळा झाला असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर परळी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते. जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. गेल्या महिन्यामध्ये याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. तसेच कंत्राटदारांकडे अडकलेल्या ९० लाख रुपयांची रिकव्हरी करण्याचे आदेश देखील दिले होते. त्यानंतर आता पुन्हा चार जणांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवार घोटाळ्याची चौकशी उशीरा होत असली तरी देखील तपास वेगाने सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in