
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयाला अल्पकाळात उदंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान,'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अधिवेशन कालावधीत २५ ऑगस्ट रोजी ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २६ ऑगस्टपासून या योजनेला प्रारंभ करण्यात आला. २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या अवघ्या १ महिन्याच्या कालावधीतच राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला. दिवसागणिक या योजनेतील ज्येष्ठांचा सहभाग वाढत असून मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक एसटी प्रवास करत आहेत. सद्यस्थितीत १६ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ ज्येष्ठ प्रवाशांनी मोफत एसटी प्रवास केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.