पश्चिम उपनगरात पाळीव प्राण्यांवर अंत्यविधी

मुंबई शहर देशात पहिले; लहान पाळीव प्राण्यांसाठी शवागारची सुविधा
पश्चिम उपनगरात पाळीव प्राण्यांवर अंत्यविधी

मुंबई : मांजर, ‌श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. विशेष म्हणजे ही सेवा विनामूल्य असून, मुंबईतील प्राणीमित्र आणि नागरिक यांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.

उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त शैलेश पेठे, सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. सचिन कुलकर्णी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज माने, डॉ. योगेश वानखेडे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राठोड यांच्यासह विविध प्राणीमित्र संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

पीएनजीवर आधारित दहन व्यवस्था

मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे. नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. पीएनजीवर आधारीत देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, अशी माहिती उपआयुक्त संजोग कबरे यांनी यावेळी दिली.

'अशी' असणार सुविधा!

-मृत लहान प्राणी जसे भटके श्वान, मांजरी इत्यादी

-दहन सेवा विनामूल्य

-वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

-दहन व्यवस्थेची क्षमता ही ५० किलो प्रतितास

-पालिकेचे किंवा खासगी नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक

logo
marathi.freepressjournal.in