
मुंबई : इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांची तक्रार दूर केली जाईल, अशी माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली.
प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे, तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी, कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. तांत्रिक अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता २६ मे ते ३ जून पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार, मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन नंबर, सपोर्ट डेस्क, संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल, ‘करिअर पाथ’ चा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लॉगइनमध्ये काही बदल करावयाचा असल्यास ग्रीव्हन्सचा टॅब उपलब्ध आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेतस्थळावर देण्यात आलेले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.