

नाशिक : ‘उद्धवजी, मुंबईमध्ये तुम्हाला अशी चपराक बसेल की तुम्ही पुन्हा कधीच उठणार नाहीत,’ अशा शब्दांत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला.
नाशिकमध्ये भाजपच्या प्रचाराचा नारळ रविवारी मोठ्या उत्साहात फोडण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘विजय संकल्प मेळावा’ पार पडला.
यावेळी मंत्री महाजन म्हणाले की, ‘गेल्या २५ वर्षांपासून मराठी मराठीचा जप करून तुम्ही मराठी माणसासाठी नेमके काय केलेत? हे आता जनतेला चांगलेच समजले आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन केवळ भूलथापा मारण्याचे काम सुरू आहे,’ असे ते म्हणाले.
मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतर महापालिकांबाबतही मोठा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘राज्यातील १० प्रमुख महापालिकांमध्ये एकाही ठिकाणी विरोधी पक्षाचा महापौर बसणार नाही. १६ तारखेला जेव्हा निकाल लागेल, तेव्हा विरोधकांना आपली जागा कळलेली असेल. मनपा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उबाठाच्या सत्तेला यंदा भाजपने सुरुंग लावण्याची पूर्ण तयारी केली आहे. महाजन यांच्या या विधानाने हे स्पष्ट झाले आहे की, भाजपने मुंबईसाठी विशेष रणनीती आखली आहे. ‘मुंबईकरांना आता बदल हवा आहे आणि तो बदल मतपेटीतून दिसेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.