

वसई : गोखीवारे ते एव्हरशाईन सिटी या वर्दळीच्या रस्त्याचे महिनाभरापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण पहिल्याच मुसळधार पावसात उखडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडून खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना वाहतूककोंडी, अपघाताचा धोका आणि मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांनी या निकृष्ट कामामागे कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे सार्वजनिक निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.