
मुंबई : बोरिवली (पश्चिम) येथील गोराई गावातील वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी मिळाली आहे. मात्र, नाल्यावरील पूल पाडकामामुळे वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांचा संपर्क तुटणार आहे. पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
गोराई गावातील पादचारी पूल निसरडा झाल्याने येथून रस्त्यावरून चालणे प्रवाशांना कठीण झाले होते. फेरीबोट पकडण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षाचालक या रस्त्याचा वापर करून गोराई गावात पलीकडे जातात. निसरड्या पादचारी पुलावरून गोराई गावातून मासे विक्री व भाजी विक्री करणाऱ्या महिला, गोराई गाव, मनोरी, कुलवेम, उत्तन या गावांमधील नागरिक, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आदी रोज ये-जा करतात. मात्र पूल निसरडा झाल्याने सर्वांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्यावरील पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझे) मंजुरी दिली आहे.