प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महायुतीची समन्वय समिती; तिन्ही पक्षांचा असणार समावेश

महायुतीच्या समन्वय समितीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महायुतीची समन्वय समिती; तिन्ही पक्षांचा असणार समावेश

मुंबई : महायुतीची राज्यातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रनिहाय तिन्ही पक्षांचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. एनडीएतील इतर घटक पक्षांचाही त्यात समावेश असेल. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय देखील महायुतीची एक कोअर टीम तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.

महायुतीच्या समन्वय समितीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे उपस्थित होते.

‘‘येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा पूर्ण विचार करताना राज्यांमध्ये ४८ लोकसभा क्षेत्रांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून ४५ च्या वर जागा निवडून येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जे ठरले होते, ते विषय पुढे नेण्यासाठी, निर्णय करणे अपेक्षित होते, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी समन्वय समितीबरोबर अन्य नेत्यांवर असेल. पण, त्याबरोबर प्रत्येक लोकसभा क्षेत्रात समन्वय करण्यासाठी या तिन्ही पक्षांबरोबर एनडीएतील अन्य घटक पक्ष या सगळ्यांबरोबरची एक समन्वय समिती सर्वसमावेशक सर्वव्यापी या पद्धतीने लोकसभा क्षेत्रात करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नावाचा विचार झाला. अंतिम निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते करतील, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

सोबतच २८८ विधानसभा क्षेत्रात आम्ही घटक पक्षांबरोबर निवडणुकांचा विचार करत आहोत. त्यामध्ये सुद्धा एक विधानसभा क्षेत्र, एक सर्वव्यापी टीम अशी कोअर ग्रुप प्रत्येक विधानसभानुसार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असून महायुतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याबाबतीतील चर्चा पूर्ण झाली. विधिमंडळामध्ये सुद्धा ज्या विविध समित्या असतात आणि या सर्व विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या समित्यांच्या बाबतीत सुद्धा त्याबद्दल आवश्यक नावे, आवश्यक कोटा आणि आवश्यक विभागणी याच्यावर एकमत झाले. तोही निर्णय काही दिवसांत घोषित होईल. एकंदरीत नियमितपणे एकत्रित निर्णय करण्याच्या प्रक्रियेला चांगली गती या बैठकीनंतर मिळाली. तिन्ही पक्षांची महायुतीतील अन्य घटक पक्षांबरोबर चर्चेला गती मिळाली याचाही आम्हाला आनंद आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

आमच्यात चांगला समन्वय

महाविकास आघाडीबद्दल विचारले असता, पहिले तर ते इंडिया नसून घमेंडी अलायन्स आहे. ते काय करतात, त्यांचा त्यांना लखलाभ असो. आमच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात आपापसातील संवाद हा दुसऱ्याने घडवून आणण्याची आवश्यकता नसल्यामुळे तो सहज आणि चांगला आहे. त्यांच्या स्तरावर याचा निर्णय होईल आणि झालाही आहे, असे शेलार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in