

मुंबई : शाळा, कॉलेज परिसरात गुटखा व सुगंधी सुपारी विक्रीवर बंदी आहे. तरीही परिसरातील पान टपरीवर गुटखा सुगंधी सुपारीची सर्रास विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अनेकदा जप्ती व फौजदारी कारवाई केल्यानंतरही दुकानदारांकडून विक्री होत असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विक्रीला चाप लावण्यासाठी गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांना मकोकोच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली सुरु असून विधी व न्याय विभागाकडे याचा प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा व मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री संपुष्टात आणण्यासाठी एफडीएने केलेल्या कारवाईत मागील सात महिन्यांत २२ कोटी १७ लाख ८९ हजार ९१४ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला. तर १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एफडीएने ३६५ दुकानांवर छापे टाकले, त्यापैकी ३५४ दुकानांत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळला आहे. राज्यात बंदी असतानाही या पदार्थांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परराज्यातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात येणारा आणि शाळा–महाविद्यालयांच्या परिसरातील टपऱ्यांवरही सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यासह सुगंधी सुपातीवर निर्बंध आणण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. या पार्श्वभूमीवर जप्ती आणि फौजदारी कारवाई नंतरही विक्री होत असल्याने या गुन्हेगारी साखळीला रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शनासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
गुजरातच्या मार्गावर लक्ष देणार
गुटखा आणि तत्सम पदार्थांचे उत्पादन गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. मात्र हे उत्पादन महाराष्ट्राच्या हद्दीत येत असल्याने चेक नाक्यांवर त्याची योग्य तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र मार्गे अन्य राज्यांमध्ये असे पदार्थ पाठवले जात असतील तर त्याचाही मागवा घेऊन जीपीएस यंत्रणा कार्यरत करून काही प्रतिबंध करता येईल का, याबाबतही विचार सुरू आहे, असे झिरवाळ यांनी सांगितले.
चण्यासाठी वापरणाऱ्या केमिकलची तपासणी
दरम्यान, चण्यांना पिवळा रंग यावा, यासाठी रसायनांचा वापर करण्यात येतो. हे रसायन आरोग्याला घातक असल्याने याबाबतच्या तक्रारी येत असून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राज्यातही जर असे प्रकार होत असतील तर त्याची तपासणी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही झिरवाळ यांनी सांगितले.