शालेय विद्यार्थ्यांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे विकार वाढले,पालकांमध्ये चिंतेची लाट

काहींना हात, पाय, मनगट आणि तोंडावर पुरळ अथवा फोड येण्याचे प्रकार वारंवार शालेय विद्यार्थ्यांमध्ये आढळू लागले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे विकार वाढले,पालकांमध्ये चिंतेची लाट

कोरोनाची भीती दूर झाल्यानंतर शाळा पूर्वीप्रमाणे जोमाने सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाऐवजी पालकांना आता वेगळीच चिंता सतावू लागली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे विकार होऊ लागल्याने आणि ते वेगाने पसरू लागल्याने पालक चिंतेत आहेत. दरदिवशी १५ ते २० प्रकरणे समोर येऊ लागल्याने डॉक्टरही चक्रावले आहेत. हे विकार रोखण्यासाठी आता पालकांनीच पुढाकार घेतला आहे.

लहान मुलांना वारंवार आजाराचा सामना करावा लागत असून ताप, घसा खवखवणे, नाक वाहणे, तोंडात व्रण येणे, तसेच भूक न लागणे, अशा समस्या उद्भवू लागल्या आहेत. काहींना हात, पाय, मनगट आणि तोंडावर पुरळ अथवा फोड येण्याचे प्रकार वारंवार शालेय विद्यार्थ्यांमध्ये आढळू लागले आहेत.

या आजाराचा फैलाव झपाट्याने होत असल्याने तसेच याचा सामना कसा करावा, याबाबत मुंबईतील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वारंवार आजारी पडल्याने मुलांचा अभ्यास बुडू नये, यासाठी आता शाळांनीही पावले उचलली आहेत. “मुलांना शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये, यासाठी आता त्यांना घरीच शालेय अभ्यासक्रम पुरवला जात आहे. शाळेतही या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे,” असे पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या अध्यक्षा स्वाती पोपट वत्स यांनी सांगितले.

हात, पाय आणि तोंडाच्या विकाराने सिमोन खंबाटा यांची दोन्ही मुले त्रस्त आहेत. ते म्हणाले की, “दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्यावर मुलांना शाळेत जाऊन अभ्यास शिकता येईल, याने मी स्वत: खूश होतो; मात्र शाळा सुरू झाल्यापासून दरदोन दिवसांनी माझी मुले आजारी पडत आहेत. त्यामुळे या आजारांची साखळी तोडायची असेल तर आपणच स्वत:च्या मुलांची काळजी घेतलेली बरी.”

संसर्गजन्य आजाराची जवळपास १०पेक्षा जास्त प्रकरणे दिवसाला आमच्याकडे येत आहेत. यामुळे मुलांना सहा ते आठ दिवस शाळेला दांडी मारावी लागते. आजाराची लागण झाल्यानंतर ही मुले पहिले तीन दिवस काहीही खाऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी त्यांना जबरदस्तीने खाऊ घालू नये. त्यांना साधे आणि पचनास हलके अन्न द्यावे, तसेच बरी होईपर्यंत त्यांना किमान आठ दिवस तरी शाळेत पाठवू नये.

- डॉ. निहार पारीख, बालरोगतज्ज्ञ आणि चिअर्स चाइल्ड केअरचे संचालक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in